गोळीला तोफगोळ्याने उत्तर द्या!   

पंतप्रधान मोदी यांचे सैन्यदलाला आदेश

नवी दिल्ली : सीमेपलीकडून केल्या जाणार्‍या दहशतवादी कारवायांना तोडीस तोड उत्तर द्या, असे आदेश पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सैन्य दलाला दिले आहेत, अशी माहिती सरकारच्या सुत्रांनी रविवारी दिली. 
 
ऑपरेशन सिंदूर कारवाईच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सैन्य दलाला सांगितले की, सीमेपलीकडून एक गोळी झाडली तर तोफगोळ्याने त्याला सडेतोड उत्तर द्या! ऑपरेशन सिंदूर अजूनही संपलेले नाही. सीमेपलीकडच्या दहशतवादावर भारताने कठोर उत्तर देण्याचे नवे तंत्र स्वीकारले आहे.पाकिस्तानला भारतासोबत सहकार्य हवे आहे. पण, तो सीमेपलीकडून दहशतवाद वाढवत चालला आहे. आता या पुढे तसे चालणार नाही. काश्मीर विषयावर भारताने कधीच मध्यस्थी स्वीकारली नाही. पाकिस्तानने व्याप्त काश्मीर बेकायदा बळकावला आहे. तो प्रथम परत करावा, यावरच चर्चा होईल.  
 
दरम्यान, परराष्ट्र सचिव विक्रम मिस्री यांनी शनिवारी सायंकाळी घोषणा केली की भारत आणि पाकिस्तानने चार दिवसांपासून सीमेपलीकडून होणार्‍या तीव्र ड्रोन आणि क्षेपणास्त्र हल्ल्यानंतर जमीन, हवा आणि समुद्र या सर्व ठिकाणी गोळीबार आणि लष्करी कारवाया तात्काळ थांबविण्याचा करार केला आहे.अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी पहिल्यांदा ही घोषणा केली. त्यांनी  दावा केला की अमेरिकेच्या मध्यस्थीनंतर दोन्ही देशांनी पूर्ण आणि तात्काळ युद्धबंदी करण्यास सहमती दर्शविली आहे.
 
अमेरिकेचे परराष्ट्र सचिव मार्को रुबियो यांनी एका निवेदनात म्हटले आहे की भारत आणि पाकिस्तान सरकारने तात्काळ युद्धबंदीवर आणि तटस्थ ठिकाणी विविध मुद्द्यांवर चर्चा सुरू करण्यास सहमती दर्शविल्याची घोषणा करताना त्यांना आनंद होत आहे. काश्मीरशी संबंधित एकमेव मुद्दा म्हणजे पाकिस्तानने बेकायदा बळकावलेला भाग परत करणे, असे सरकारी सूत्रांनी काल सांगितले. जोपर्यंत पाकिस्तानचा भारताविरुद्ध पुरस्कृत दहशतवाद सुरू आहे तोपर्यंत सिंधू पाणी करार स्थगित राहील. पाकिस्तानशी फक्त लष्करी कारवाई महासंचालकांद्वारे  (डीजीएमओ) चर्चा केली जाईल. चर्चेसाठी दुसरा कोणताही मुद्दा नाही, असे सूत्रांनी सांगितले. ७ मे रोजी दहशतवादी तळांवरील हल्ल्यानंतर भारताची भूमिका अशी होती की जर पाकिस्तानने गोळीबार केला तर त्याला  आक्रमक प्रत्युत्तर दिले जाईल. त्यानंतर पाकिस्तानी डीजीएमओ यांनी १० मे रोजी भारतीय डीजीएमओशी संपर्क साधला होता.

ऑपरेशन सिंदूर सुरूच; हवाई दलाकडून स्पष्ट

ऑपरेशन सिंदूर अंतर्गत पाकिस्तान विरोधातील कारवाई चोखपणे पार पाडली आहे आणि ऑपरेशन सिंंदूर यापुढेही सुरू राहील, असे हवाई दलाने रविवारी स्पष्ट केले.भारत आणि पाकिस्तान यांनी शस्त्रसंधी तसेच हल्ले थांबविण्याचा निर्णय घेतल्याची माहिती परराष्ट्र मंत्री डॉ. एस. जयशंकर यांनी दिली. यांनंतर हवाई दलाने ऑपरेशन सिंदूर अंतर्गत केवळ आणि केवळ दहशतवाद्यांविरोधात कारवाई केली आहे. तशी कारवाई भविष्यात देखील सुरू राहणार आहे, असे स्पष्ट केले ऑपरेशन सिंदूर अंतर्गत ७ मे पासून कारवाईस प्रारंभ झाला होता. त्यात व्याप्त काश्मीर आणि पाकिस्तान येथील दहशतवाद्यांचे ९ तळ आणि ठिकाणे नष्ट केली. जैश ए मोहम्मद आणि लष्कर ए तोयबाच्या पाच म्होरक्यांसह सुमारे १०० दहशतवादी ठार झाले. 
 
दरम्यान, भारतीय सैन्याने रफीकी (शोरकोट, झांग), मुरीद (चकवाल), नूर खान (चकलाला, रावळपिंडी), रहीम यार खान, सुक्कूर आणि चुनियान (कसूर) या महत्त्वाच्या पाकिस्तानी हवाई तळांवर हल्ला केला होता. पसरूर आणि सियालकोट येथील रडार ठिकाणे  तसेच स्कर्दू, भोलारी, जेकोबाबाद आणि सरगोधा येथील मोक्याच्या हवाई तळांना देखील लक्ष्य केले.

Related Articles